Pages

Wednesday 27 November 2013

९०चा दूरदर्शन आणि आपण (जुन्या आठवणी)



1.रविवारी सकाळी अंघोळ करून टीव्ही समोर बसायचो



2."रंगोली" मधल्या जुन्या नवीन गाण्यासाठी वाट बघायची


3."जंगल-बुक" बघण्यासाठी सगळे मित्र मंडळी घरी जमायची

4.शक्तिमान बघण्यासाठी पळत पळत येऊन टीव्ही समोर बसायचं

5.महाभारत चालू होताच घरातले सगळे एकत्र जमायचे

6."चंद्रकांता" पाट्या पासून सेवट पर्यंत बघायचं

7. चंद्रकांता चा शेवट सस्पेन्स असायचा आणि आपण आठवडाभर 
याचा विचार करत बसायचो

8.शनिवार आणि रविवार च्या पिक्चर ची वाट बघत बसायची

9.कोण जर नेता मेला आणि नेहमीच्या सिरीयल
लागल्या नाहीत तर त्या नेत्याला मनापासून शिव्या घालायच्या

10.सचिन आउट झाल्यावर ब्याट-बॉल घेऊन गप बाहेर खेळायला जायच

11."मूक-बधिर" समाचार लागले कि त्यांची नक्कल करायची

12. हवने ऐन्टेना हलला तर त्याला छतावर जाऊन हलवत बसायचं ..

Facebook , Whatsapp च्या जमान्यात पुन्हा ते दिवस येतील का.... ? ? ?

खरच आयुष्यात शेवटही आठवणीच राहतात ??

Tuesday 26 November 2013

गुगलचे मिशन नेट वुमन!



आई मुलाचा अभ्यास घेतेय... तिच्या हातात एक पुस्तक आहे... ती मुलाला प्रश्न विचारते.. तो विचारात पडतो. 'इतका सोपा प्रश्न आहे!', ती म्हणते. त्यावर मुलगा आईच्या हातातून पुस्तक काढून घेतो आणि म्हणतो, 'सोपा असेल तर तूच सांग ना त्याचं उत्तर.' ती घडाघडा माहिती सांगू लागते आणि मुलगा चकीत होऊन तिच्याकडे बघू लागतो. तिने आपल्या मांडीवर मोबाइल ठेवलेला असतो आणि इंटनेटवरील माहिती ती त्याला सांगत असते. गुगल इंडियाच्या नव्या मोहिमेची ही जाहिरात आहे. वर्षभरात पाच कोटी महिलांना इंटरनेटसॅव्ही बनवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. 

जवळपास दोन अब्ज इंटरनेट यूजर्स असलेला भारत इंटरनेट मार्केटमध्ये अमेरिकेलाही मागे टाकण्याच्या मार्गावर आहे. मात्र, ऑनलाइन यूजर्सपैकी केवळ एक तृतीयांश यूजर्स या महिला आहेत. महिलांचे सबलीकरण करण्यात आणि त्यांचे आयुष्य बदलण्यात इंटरनेट महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असे गुगल इंडियाचे म्हणणे आहे. इंटरनेटमुळे महिलांना शिक्षणाच्या आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. एवढेच नव्हे, तर प्रसूतीदरम्यान होणारे मृत्यू, बालमृत्यू दर कमी होण्यासही मदत होऊ शकते, असे अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 

महिलांसाठी वेबसाइट 

महिलांना इंटरनेटचे कोणते फायदे मिळू शकतात याबाबत जागृती करणे, त्यांना इंटरनेटबाबत साक्षर बनवणे, त्यांना इंटरनेट सहज उपलब्ध होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे आदी उपक्रम गुगल इंडिया राबवणार आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून गुगल इंडिया 'मास मीडिया कॅम्पेन' सुरू करणार आहे. महिलांसाठी www.hwgo.com ही वेबसाइटही तयार करण्यात आली आहे. इंटरनेट आणि कम्प्युटर कसे वापरावेत याबद्दल बेसिक माहिती, मार्गदर्शन करणारे काही व्हिडीओही वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ही वेबसाइट हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहेत. 

हेल्पलाइन 

इंटरनेटबद्दल कोणतीही समस्या असल्यास महिला १८००४१९९९७७ या टोल फ्री क्रमांकावर फोनही करू शकतात. या उपक्रमाला एचयूएल, इंटेल आणि अॅक्सिस बँकेचे सहकार्य लाभले आहे. इंटेल महिलांसाठी 'ईझी स्टेप' नावाने मोबाइल अॅप्लिकेशन सुरू करणार आहे. ते अॅप अँड्रॉइड प्लेस्टोअरमध्ये उपलब्ध असेल.

बसस्टँडची नोंद गुगल मॅपवर

गुगल मॅप किंवा अन्य मॅपींग सॉफ्टवेअरवर राज्यातील एसटी बसस्टँडची माहिती देण्यात आलेली नाही. यामुळे परदेशी पर्यटकांना एसटीच्या पिकअप पॉइंट आणि एसटी बसस्टँडची माहिती मिळणे अवघड जाते. हे लक्षात घेऊन एसटी महामंडळ आगाराच्या सर्व बसस्टँडची माहिती गुगल मॅपवर नियमानुसार अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे. सध्या या माहितीचा उपयोग हा सांख्यिकी विभागाकडून केला जात आहे. आगामी काळात वाहतूक व्यवस्‍था सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जाईल. 

एसटी महामंडळाचा कारभार व्यवस्‍थापकीय संचालक विकास खारगे यांनी संभाळल्यानंतर विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. प्रत्येक आगाराचे कामकाज सुधारावे यासाठी थेट आगार व्यवस्‍थापक, विभागीय नियंत्रक आणि विभागीय व्यवस्‍थापक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करण्यास सुरुवात केली. यामुळे समांतर वाहतूक, आणि विभागीय पातळीवरील विविध समस्या सोडविण्यात यश आले. एसटी महामंडळाचा कारभार अधिक चांगला व्हावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना (एनआरएचएम) विविध स्‍थळांची नोंद करून ही योजना अधिक चांगल्या पद्धतीने राबविण्यासाठी खारगे यांनी काम केले आहे. एसटीचे राज्यभरात विविध ठिकाणी बसस्टँड आहेत. या बसस्टँडची माहिती गुगल मॅप किंवा अन्य मॅपवर अपडेट केली जाणार आहे. अक्षांश आणि रेखांशांच्या अंतर्गत सर्व बसस्टँडची नोंद केली जात आहे. 

या संपूर्ण माहितीची नोंद घेण्याचे काम एका खासगी संस्‍थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. सध्या मॅपींग अपडेट करण्याचे काम सांख्यिकी विभागासाठी केले जात आहे. मात्र, आगामी काळात या माहितीचा उपयोग समांतर वाहतूक किती आणि कोणत्या बस स्‍थानकातून केली जाते, याची माहिती संकलित केली जाणार आहे.

Monday 25 November 2013

हर एक फ्रेंड जरुरी होता है

कामाच्या ठिकाणी, कॉलेजमध्ये किंवा एखाद्या नात्यातल्या गोंधळाबाबत तुम्ही तिच्याशी केव्हाही जाऊन मन मोकळं करू शकता. ती तुमच्याकडे जराही समीक्षक दृष्टीनं न पाहाता तुम्हाला अत्यंत प्रॅक्टिकल सल्ले देते. ती तुमची खरी कौन्सेलर मैत्रीण असते. तिच्याशी तुम्ही जगातल्या काय पण गोष्टी बोलू शकता. ज्या वेळी तुमच्याकडे कुणी लक्ष देण्याची आवश्यकता असते, त्या प्रत्येक वेळी ती असते. 

पक्की सखी 


तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक चढ-उतारादरम्यान तिनं तुम्हाला साथ दिली आहे. तुमचे सगळे मूड झेलले आहेत. ती तुम्हाला खूप जवळून आणि चांगलं ओळखते. तुम्ही तिच्याशी प्रचंड भांडणं केली आहेत, विविध मुद्द्यांवर वाद घातले आहेत; तरीही तुम्ही एकमेकींना सोडू शकत नाही. कारण तुमचं एकमेकींवर प्रचंड प्रेम आहे. 

धमाल मैत्रीण 

तुम्हाला ज्या क्षणी वेडपणा करावासा वाटलाय, जेव्हा तुम्ही बालिशपणा केलाय, त्या प्रत्येक वेळी ती तुमच्याबरोबर होती. तिच्याशिवाय त्या वेडसर कृतीलाही मजा आली नसती. जगात कुठे, काय भन्नाट घडतंय, याची तिला खडान् खडा माहिती असते. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही सहभागी व्हालच आणि तिच्याबरोबरच तिच्याइतकीच धमाल कराल, याचीही जबाबदारी तीच घेते. तिच्याबरोबर गप्पा मारण्यात रात्र कधी गेली, हे कळत नाही. 

प्रामाणिक ती 

ती कधीही फक्त तुम्हाला चांगलं वाटेल म्हणून कौतुक करणार नाही किंवा तुमच्याविषयी वाईटात वाईट गोष्टही तुमच्या तोंडावर सांगायला घाबरणार नाही. ती तुमची खरी प्रामाणिक मैत्रीण असेल, जी तुम्ही कितीही चिडलात, तरी तिच्या मतावर ठाम असेल. 

काळजीवाहू 

तुम्हाला थोडं जरी कसंतरी व्हायला लागलं, तरी ती तुम्हाला लगेच पाणी आणून देते. खुर्चीवर शांत बसायला लावते. तुमच्यासाठी उत्तम खायला करून देते आणि तुमची सर्व तऱ्हेनं काळजी घेते. आई किंवा मोठ्या बहिणीच्या मायेनं तुमचं करणारी ही प्रेमळ मैत्रीण असते. 

समजून उमजून फुलवा नातं


मुलांकडून असलेल्या मुलींच्या लग्नाविषयीच्या अपेक्षा, जास्त पगाराची नोकरी असणारी बायको असूनही मुलांचा आड येणारा 'अहं'... यांसारख्या लग्नासंदर्भातल्या बाबींविषयी लग्नापूर्वीच नेमकं काय लक्षात घ्यायला हवं? याविषयी...

शिक्षण संपवून मुलगा नोकरीत धंद्यात स्थिरस्थावर झाला, की त्याच्या आई-वडिलांची (आईची जरा जास्तच) आणि अर्थातच इतरांची त्याच्या लग्नाची घाई सुरू होते. मुलानं स्वतःचं लग्न जमवलं नसेल, तर कशी मुलगी हवी? नोकरी करणारी हवी, की नको? ती एकत्र कुटुंबात राहील का? हल्लीच्या मुली, त्यांचं वागणं-बोलणं, कपडे, टीव्हीतील सुना अशा एक ना अनेक विषयांवर घरात चर्चा सुरू होते.

काळाची गरज...



पूर्वीच्या काळी मुलाचं लग्न ही तशी सोपी गोष्ट होती. (लग्नाच्या बाजारात मुलाचं पारडं नेहमीच जड असायचं) नवरा-बायकोच्या संसारातल्या भूमिका निश्चित होत्या. नवऱ्याने नोकरी-धंदा करून अर्थार्जन करून घरीच, कुटुंबाची सर्व जबाबदारी संभाळायची आणि बायकोने घर-संसार, मुलं, पाहुणे वगैरे गोष्टी बघायच्या; पण आता बदलत्या काळात या भूमिका धूसर झाल्या आहेत. दोघांनी नोकरी करून घराची, कुटुंबाची जबाबदारी उचलणं, ही काळाची गरज झाली आहे. त्यामुळे याला सुसंगत अशी पुरुषांची मानसिकता बदलणंसुद्धा गरजेचं झालं आहे.

हल्ली मुलीसुद्धा उच्चशिक्षित, कर्तबगार, महत्त्वाकांक्षी असतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्याकडून विविध कल्पना, इच्छा, अपेक्षा, स्वप्ने असतात. त्यांची अर्थातच फक्त घरी राहून घरकाम करणं, मुलं संभाळणं या सगळ्याची तयारी नसते आणि तिथंच तणावाला सुरुवात होते. त्याची महत्त्वाची कारणं म्हणजे मुला-मुलींचं वाढतं वय आणि दोघांच्याही अवास्तव अपेक्षा त्यामुळे लग्न ठरवणं आणि टिकवणं यात अडचणी येताना दिसतात.

अपेक्षा मुलींच्या...

लग्न ठरवताना मुलींना फक्त इंजिनीरिंग, डॉक्टर, सीए, आयटी झालेलीच मुलं हवी असतात. स्वतःचं घर, गाडी, इंटरनॅशनल कंपनीतली नोकरी अशाच मुलांना मुली प्राधान्य देतात. बीए, बीकॉमसारखं शिक्षण घेतलेल्या मुलांना लग्नासाठी मुली आणि त्यांच्या पालकांकडून फारशी पसंती दिली जात नाही. स्वतःचं घर, गाडी घेईपर्यंत मुलांचं वय वाढत जातं; पण अशा तिशीच्या काकांशी लग्न करायची मुलींची तयारी नसते. त्यामुळे तर हल्ली लग्नाच्या बाबतीत मुलांची फारच कुचंबणा होताना दिसते. या सगळ्याबरोबरच मुलांना घरकाम, स्वयंपाक, मुलं संभाळणं या सर्व गोष्टी येणं आवश्यक समजलं जातं, तर दुसऱ्या बाजूला बायकोने उच्च शिक्षण घेतलेलं असायला हवं, नोकरी करायला हवी; पण त्याचबरोबर घर, मुलं, पै-पाहुणे, स्वयंपाक, घरकाम, बाहेरची कामं हे सर्व बायकोनंच केलं पाहिजे. (कारण ते बायकोनेच करायचं असतं.) अशी मुलांची मानसिकता दिसून येते. या सगळ्यामुळेच दोघांच्याही मनात लग्नाबद्दल गोंधळ दिसून येतो.

मुलांसाठीही विवाहपूर्व समुपदेशन

पत्रिका, ज्योतिषी यांच्याएवढंच महत्त्व विवाहपूर्व समुपदेशनाला (Pre marital counsclling) आलं आहे; पण बरेचदा हे सर्व मुलींसाठीच असतं, असा असज दिसून येतो;

कारण लग्नानंतर तडजोडी फक्त मुलींनाच कराव्या लागतात. मात्र, आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. तडजोडी या मुला-मुलींना, दोघांनाही कराव्या लागणार आहेत. विवाहपूर्व समुपदेशनामुळे आपल्याला स्वतःच्या तसंच आपल्या जोडीदाराच्या, आयुष्याकडून काय अपेक्षा आहेत, हे समजायला मदत होते. जोडीदाराची निवड करताना दोघांचं शिक्षण, नोकरीचं स्वरूप, कामाच्या वेळा, ठिकाण, पगार, भविष्य यांचाही विचार करणं आवश्यक ठरतं. अजूनही नवऱ्याचा पगार बायकोपेक्षा जास्त असणं आवश्यक वाटतं. नाहीतर त्यात अहंकार डोकावण्याची आणि मध्ये येण्याची शक्यता असते.

अपेक्षांचा विचार लग्नापूर्वीच...

रोहित आणि रचनाचा प्रेमविवाह. रोहित मेकॅनिकल इंजिनीअर, तर रचना बीएससी; पण एका आयटी कंपनीत नोकरीला. हळूहळू तिच्या कामातली प्रगती आणि सतत नवनवीन शिकण्याच्या वृत्तीमुळे तिला लवकरच चांगल्या आयटी कंपनीत नोकरी मिळाली. वरचेवर युरोप, अमेरिका वाऱ्या सुरू झाल्या. रोहितच्या पगारापेक्षा तिचा पगार वाढला. रचनाच्या वागण्यात त्यामुळे फारसा फरक पडला नाही; पण रोहितला खूप असुरक्षित आणि कमीपणा वाटायला लागला. तेच तेच कंटाळवाणं काम, बेताचा पगार यामुळे त्याची चिडचिड सुरू झाली. शेवटी प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं.

अजूनही बरेचदा मुलांना बायकोने त्यांच्यापेक्षा जास्त पगार मिळवणं, पुढे जाणं सहन होत नाही. अशा वेळी खरंतर गरज असते, ती मनाचा मोठेपणा दाखवायची. Behind every successful woman there is a man असं का असू नये ‌बरं? हल्लीच्या नोकरीच्या संधी आणि बदलत्या जीवनशैलीत मुलांनी लग्नाचा विचार करण्याआधी या सर्वच गोष्टींचा विचार अवश्य करावा. त्याबद्दल आपल्या जोडीदाराशी सविस्तर चर्चा करावी. स्वयंपाक, घरकाम, साफसफाई, खरेदी, मुलं, शाळा, अभ्यास या सर्वांची जबाबदारी मुलांनीसुद्धा उचलायला हवी.

अडचणीतून मार्ग असतोच

सुयश आणि नेहा दोघेही नोकरी करणारे; पण कामाच्या वेळा वेगवेगळ्या. नेहाच्या कामाची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी कितीही वाजेपर्यंत, तर सुयश संध्याकाळी पाच ते रात्री अडीचपर्यंत कामात बुडालेला. लग्नानंतर थोडे दिवस कशीबशी त्यांनी तडजोड केली; पण घरकाम, स्वयंपाक, स्वच्छता, बाहेरची कामं कोणी करायची, यावरून खटके उडायला सुरुवात झाली. त्यामुळे नेहाने नोकरी सोडून टीपिकल बायकोप्रमाणे घरचं सर्व करावं, असं सुयशला वाटायला लागलं. सासूला तीन मंगळागौरीची पूजा, गौरी-गणपती वगैरे करावं, असं वाटलं; पण नेहाला वेळ होता कुठे?

आता यातून मार्ग तरी कसा काढणार? म्हणजे तिने नोकरी सोडून घरी बसायचं? तर तिची तयारी नव्हती. मग सुयशनेच सकाळची थोडी घरातली कामं केली तर? 'अमेरिकेत मुलगा छान पोळ्या करतो, कुकर लावतो' म्हणणाऱ्या आईला भारतात मुलाने घरकाम करणं कमीपणाचं का वाटावं, बरं?

अशावेळी दोघांनी आणि अर्थातच घरच्या लोकांनी बोलून, सामंजस्याने मार्ग काढणंच योग्य. प्रत्येक वेळी घटस्फोट हा मार्ग कसा असू शकेल?

जोडीदाराची निवड करताना

- स्वतःला आणि जोडीदाराला एकमेकांच्या गुण दोषांसकट पूर्णपणे समजून घ्या.

- जोडीदाराबद्दल वास्तव आणि तर्कशुद्ध अपेक्षा ठेवा.

- लग्नानंतर बदलणाऱ्या जीवनशैली, नाती, परिस्थितीशी जुळवून घ्यायची तयारी ठेवा.

- लग्नाआधी सेक्स, फॅमिली प्लॅनिंगविषयीचे एकमेकांचे दृष्टिकोन समजावून घ्या. त्यात मुलगा असल्याचा वरचढपणा किंवा अहं शक्यतो नकोच.

- एकमेकांचे छंद, आवडी, सर्जनशीलता यांना प्रोत्साहन द्या.

- हल्लीच्या काळात स्वयंपाक, घरकाम, मुलांचं संगोपन करण्यात पुरुष म्हणून कमीपणा वाटून घेऊ नका. घरात पालकांनी स्वतःच्या मुलांना त्यासाठी पाठिंबा द्यावयास हवा.

- कुटुंबासाठी आर्थिक तरतुदी, बचत यांसारख्या गोष्टींमध्ये बायकोचं मत घ्यायला विसरू नका.

- समस्या निर्माणच होऊ नयेत म्हणून किंवा विकोपाला जाऊ नयेत म्हणून कोणाशी तरी मनमोकळं बोला.

- स्वतःला काम करणं शक्य नसेल, तर निदान बायकोने केलेल्या कामाचा आदर तरी करा.